
महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २ फेब्रुवारी २०२४ च्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करणे बंधनकारक होते असे असतानाही अद्याप सावंतवाडी तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित झालेली आढळून आलेली नाही. अशा परिस्थितीत सध्या प्रशासनाच्या विविध योजनांसाठी सामान्य नागरिकांना ग्रामपंचायत मार्फत लागणारे दाखले मिळताना अनेक अडचणी येत आहेत. ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात वेळेत न येणे तसेच वेळेपूर्वी कार्यालयात उपस्थित नसणे. अशामुळे शासनाच्या योजनांचा लाभ घेताना दाखले मिळण्यास उशीर झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहत आहे. ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकारी यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वस्तीसाठी राहणे शासनाच्या नियमानुसार बंधनकारक आहे. त्यासाठीच त्यांना शासनाचा निवासी भत्ता भेटत असतो तरी सुद्धा बरेचसे अधिकारी हे आपल्या मूलभूत सोयीसाठी आपल्या कार्यक्षेत्रात न राहता आपल्या मूळ गावी किंवा शहराकडे राहण्यास पसंती दर्शवितात व शासनाच्या भत्त्याचा विनाकारण लाभ घेतात.ह्या सर्व बाबी लक्षात घेता हे अधिकारी शासनाची कुठेतरी फसवणूक करत आहे असे निदर्शनास येत. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री. मिलिंद सावंत यांनी सावंतवाडी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिक पद्धतीच्या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. त्यांना देण्यात येणारा निवासी भत्ता याबाबत योग्य ती शहानिशा करावी म्हणून सावंतवाडी तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. ही कारवाई लवकरात लवकर प्रशासनाने न केल्यास येत्या १५ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गटविकास अधिकारी कार्यालयासमोर मनसे स्टाईल मध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.
