
दिनांक: २९/०६/२०२६
सावंतवाडी : “निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार असून योग ही निरोगी, संतुलित आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना निसर्गाशी नाते जपावे आणि दैनंदिन जीवनात योगाचा स्वीकार करून शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास साधावा,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी केले.
सावंतवाडी शहरातील मिलाग्रीस हायस्कूल येथे ‘निसर्ग व योगाचे महत्त्व : आपली जबाबदारी आणि कर्तव्य’ या विषयावर प्रा. रुपेश पाटील यांचे वैचारिक मार्गदर्शन व्याख्यानाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. शिबिरात प्रा. पाटील यांनी विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे महत्त्व प्रभावी उदाहरणांसह तसेच पॉवर पॉइंट सदरीकरणातून समजावून सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आजच्या धकाधकीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी निसर्गाशी नाळ जपावी, निरोगी जीवनशैली स्वीकारावी आणि योगाच्या माध्यमातून शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य साधावे, या उदात्त हेतूने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरासाठी प्रा. रुपेश पाटील यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी अत्यंत संवादात्मक, प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक संवाद साधला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी प्रा. रुपेश पाटील यांचे शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व सुपारीचे रोप देऊन स्वागत केले.
आपल्या मार्गदर्शनात प्रा. पाटील यांनी सांगितले की, “निसर्ग हा मानवाचा पहिला आणि सर्वोत्तम गुरु आहे. झाडे, पाणी, हवा आणि जैवविविधतेचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे. निसर्गाशी सुसंवाद साधणारा माणूसच खऱ्या अर्थाने आनंदी आणि निरोगी जीवन जगू शकतो.”
योगाच्या महत्त्वावर विवेचन करताना त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचे महत्त्व पटवून दिले. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन शांत होते, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते, तणाव कमी होतो आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो, असे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावावर योग हा प्रभावी उपाय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारून वृक्षारोपण, जलसंवर्धन, प्लास्टिकमुक्त परिसर आणि स्वच्छतेच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यांच्या प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शारदा गावडे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक दत्ताराम नाईक यांनी केले.
यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गसंवर्धनाची जाणीव, योगाविषयी सकारात्मक दृष्टिकोन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे रुजल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
