आताच शेअर करा

दिनांक: १३/०८/२०२६

बांदा: भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी, तिरंग्याबद्दल आदर आणि अभिमान निर्माण व्हावा तसेच प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपीच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ओठांवर देशभक्तीपर घोषणांनी घारपी परिसर दुमदुमून गेला. “एकच नारा, एकच नारा… हर घर तिरंगा, घर घर तिरंगा!”, “भारत माता की जय!”, “वंदे मातरम्!”, “जय हिंद!” अशा जोशपूर्ण घोषणांनी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.  तिरंग्याचा वापर करून आकर्षक सजावट केलेल्या सायकल‌वरही विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.
शाळेपासून सुरू झालेली ही रॅली गावातील विविध भागांतून मार्गक्रमण करत नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करीत पुढे सरकली. विद्यार्थ्यांनी हातातील फलकांद्वारे राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि नागरिकांची देशाप्रती असलेली जबाबदारी याबाबत जनजागृती केली.
या रॅलीमुळे गावातील वातावरणात देशभक्तीचा उत्साह निर्माण झाला. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत रॅलीला शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’चा संदेश घराघरात पोहोचविण्याचा अभिनव प्रयत्न या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आला. केवळ तिरंगा फडकविणे नव्हे, तर राष्ट्रध्वजाबद्दल सन्मान, राष्ट्रप्रेम आणि देशाच्या एकात्मतेची भावना प्रत्येकाच्या मनात रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत ‘तिरंगा हा आपल्या राष्ट्राच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा प्रतीक आहे’ हा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे रॅलीला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
या जनजागृती रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक  जे.डी. पाटील तसेच शाळेतील शिक्षक आशिष तांदुळे व धर्मराज खंडागळे यांचे मार्गदर्शन  केले.  यावेळी केंद्रप्रमुख ज्योत्स्ना पाटील यांनीही मार्गदर्शन केले. या रॅलीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर उपाध्यक्ष संतोष कविटकर, सदस्य यशोदा गावडे,सहदेव गावडे,बाबू गावडे, वासुदेव नाईक,वर्षा शेणगी, उत्तरा नाईक,अक्षरा असनोडकर,जानकी गावडे,रीया कविटकर,विजया कविटकर, संचिता सावंत अंगणवाडी सेविका संजना गालकर, अमृता कविटकर आदि उपस्थित होते..विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या सहभागातून हा देशभक्तीपर उपक्रम उत्साहात पार पडला.
“तिरंगा घरावरच नव्हे, तर प्रत्येक भारतीयाच्या मनात फडकला पाहिजे,” या भावनेने घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिलेला ‘हर घर तिरंगा’चा संदेश परिसरात सर्वांचे लक्ष वेधून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *