
शिवसेना शहरप्रमुख व बांदा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांचे वक्तव्य
बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: ११ जुलै २०२४
रविवारी तेरेखोल नदीला आलेल्या महापुरात बांदा शहरातील व्यापाऱ्यांची दुकाने व अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरून नुकसान झाले. तसेच परिसरातील ग्रामीण भागातील शेतीचे देखील अतोनात नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्तांची यादी बनवावी अशी मागणी शिवसेना बांदा शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांनी केली आहे. स्थानिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्री दीपक केसरकर तसेच तहसीलदार श्रीधर पाटील यांचे लक्ष वेधू असेही त्यांनी सांगितले.
श्री काणेकर यांनी सांगितले कि, बांदा शहर व परिसराला रविवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. यात शहरातील आळवाडी, निमजगा भागातील दुकानात पावसाचे पाणी शिरले. यामध्ये दुकाने व घरातील साहित्याचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले. २०२१ च्या महाप्रलायात देखील येथील व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते, मात्र यातील काही व्यापाऱ्यांना अद्यापपर्यंत भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे महसूल विभागाने लवकरात लवकर पंचनामे करावेत.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी शिरल्याने शेतीचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेती वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे कृषी विभागाने देखील तात्काळ शेती नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी श्री काणेकर यांनी केली आहे.
