
दिनांक: २९ नोव्हेंबर २०२५
सावंतवाडी । प्रतिनिधी : मतदार केंद्रबिंदू म्हणून मतदारांचा म्हणजेच नागरिकांचा विकास हाच एकमेव अजेंडा घेऊन आम्ही या नगरपरिषदांच्या निवडणुकांना सामोरे जात आहोत. भारतीय जनता पार्टी ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढवीत आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही जिल्ह्यातील चारही नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय होऊन इतिहास घडणार, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखनराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, सावंतवाडी राजघराण्याचं स्थान हे राजकारणापलीकडचं आहे. या घराण्याने या शहरासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. या घराण्याने काहीच केलं नसतं तर आजची सावंतवाडी दिसलीच नसती. त्यामुळे हे राजघराणं ही सावंतवाडीची अस्मिता आहे. मात्र या निवडणुकीत ज्या पद्धतीने या राजघराण्यावर टीका होत आहे ती निश्चितच योग्य नाही. राजघराणं संपलं असं म्हणणाऱ्यांना तेथील नागरिकच दोन तारीखला मतदानातून उत्तर देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज घराण्याने जेव्हा निवडणूक लढायची इच्छा व्यक्त केली तेव्हा मी स्वतः आमदार दीपक केसरकर यांच्याशी बोललो व त्यांना राजघराण्याची भेट घेण्याचे सांगितले. त्यांना भाजपमधून लढायचं आहे. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. सावंतवाडीतील या जागेवर भाजपचा नगराध्यक्ष होता त्यामुळे आमच्या हक्काची जागा आम्ही कशी सोडायची असा सवाल करीत उगाच कोणी गैरसमज पसरून देऊ नये युती का झाली नाही याचे उत्तर ३ तारीख नंतर नक्कीच देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील रुग्णांना गोवा बांबोळी येथे उपचारासाठी जावे लागते तसेच येथील युवक युवतींना रोजगारासाठी गोव्यात जावे लागते ते मला निश्चितच आवडत नाही. त्यामुळे आगामी ४ वर्षात आरोग्याचा हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार व स्थानिकांना याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणार, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सावंतवाडीची शांतता कोणीही बिघडवली नाही. या संपूर्ण निवडणुकीत अशी एकही घटना घडली नाही व पालकमंत्री म्हणून मी ती घडूही देणार नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर शांतपणे या निवडणुकीला सामोरे जात आहोत. कोणी कितीही दिवसण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही आमचा तोल ढळू देणार नाही. विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे विकासाबाबत अपयशी ठरलेल्यांनी केवळ राजकारणासाठी प्रत्येक निवडणुकीत तेच तेच मुद्दे उगाळून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करून देणे योग्य नव्हे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. ते प्रचारासाठी जिल्ह्यात येत आहेत. मात्र चार पैकी केवळ तीनच ठिकाणी ते सभा घेणार आहेत. कणकवलीत ते येणार नाहीत. तिथे तर उद्धव ठाकरे यांचा जिल्हाप्रमुख निवडणूक लढवीत आहे शहर विकास आघाडी झाली आहे मग ते तिथे प्रचारासाठी का येत नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कोणतीही निवडणूक सोपी घेत नाही. तसेच आम्ही कोणालाही कमी लेखत नाही. पूर्ण ताकद लावून आम्ही लढतो. त्यामुळे जनतेने ठरवावे की त्यांनी कोणासोबत राहाव. आज राज्यात उबाठाची काय परिस्थिती आहे हे जनतेला माहित आहे त्यामुळे जनता नक्कीच योग्य तो निर्णय घेईल व चारही नगरपरिषदांमध्ये भाजपचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आजारपण व राजकारण याचा प्रश्नच येत नाही. आ. दीपक केसरकर यांचं आरोग्य उत्तम राहो ते ठणठणीत बरे आहोत या आमच्या त्यांना नेहमीच सदिच्छा आहेत. तीन तारीख नंतर आम्हाला एकत्रच काम करायचं आहे. सावंतवाडीच्या विकासासाठी श्रद्धाराजे यांच्या नेतृत्वात आम्ही केसरकर यांना सोबत घेऊनच काम करणार आहोत, असेही ते म्हणाले.
*श्रद्धाराजेंच्या नेतृत्वात सावंतवाडीचा सर्वांगीण विकास करू*
मागील पोटनिवडणुकीमध्ये सावंतवाडीकर जनतेने भारतीय जनता पार्टीला संधी दिली होती. मात्र त्यावेळी खूपच कमी कालावधी असल्याने व त्यातच कोरोना महामारीमुळे अपेक्षित काम करता आले नाही. आज देशात व राज्यात आमची सत्ता आहे मुख्यमंत्री आमचे आहेत मी स्वतः पालकमंत्री आहे खासदार नारायण राणे हे आमच्या सोबत आहेत. आमचा रोड मॅप तयार आहे. आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धाराजेंकडेही सावंतवाडीच्या विकासाचे व्हिजन आहे. त्यामुळे जनतेने नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून देऊन भारतीय जनता पार्टीला साथ दिल्यास
पुढील पाच वर्षात श्रद्धा राजेंच्या नेतृत्वात सावंतवाडीकरांचा सर्वांगीण विकास करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
*राणेसाहेबांचं खच्चीकरण केलं जातयं असं केसरकरांनी म्हणणे हास्यास्पद*
भारतीय जनता पार्टीत खासदार नारायण राणे यांचे खच्चीकरण होत आहे असे आमदार दीपक केसरकर म्हणत असतील तर ते केवळ हास्यास्पद आहे. कथित दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून २०१४ पासून ते २०२४ पर्यंत राणेसाहेबांना व राणे कुटुंबाचे सर्वाधिक खच्चीकरण कोणी केले हे येथील जनतेला माहिती आहे. २०१४ मध्ये निलेश राणे यांच्या विरोधात कोणी शड्डू ठोकला होता. आमच्यावर कोणी गुन्हे दाखल केले व अटकेची कारवाई देखील केली हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे राजकारणासाठी उगाच काहीतरी बोलून दिशाभूल करणे त्यांनी आता थांबवावे. भारतीय जनता पार्टीने राणे साहेबांना मोठा मानसन्मान दिला. राज्यसभा खासदार, केंद्रीय मंत्री व आता लोकसभा खासदार ही पदं भाजपानेच राणे साहेबांना देऊन त्यांना ताकद देण्याचे काम केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी राणेसाहेबांचा आदर व सन्मान केला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील त्यांचा यथोचित मानसन्मान राखला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील प्रचार आटोपून मुंबईला निघताना त्यांनी राणेसाहेबांची भेट घेऊनच ते निघाले. राणे साहेबांनी देखील आमच्या सर्व नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आशीर्वाद दिले. त्यामुळे उगाच कोणी गैरसमज पसरून आमच्या नेत्यांवर टीका करू नये, असा सल्ला देखील पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.
