आताच शेअर करा

दिनांक १७ जुलै २०२५

संपादकीय (आर्टिकल)

युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक आणि कल्चरल ऑर्गनायझेशन  हि संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. या संस्थेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण, विज्ञान, सांस्कृतिक आणि माहिती या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवून जागतिक शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करणे आहे. या संस्थेची मुख्य कार्य जागतिक वारसा स्थळे, शिक्षण क्षेत्रातील धोरण निर्मिती, भौगोलिक व सांस्कृतिक विविधतेचा सन्मान, साक्षरता वाढविण्यासाठी  जागतिक कार्यक्रम राबवणे अशी आहेत. जागतिक वारसा स्थळांमध्ये आपल्या भारत देशाचेही नाव येते. आतापर्यंत  युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये भारतातील ४० पेक्षा अधिक जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. उदा. अजंठा एलोरो लेणी, ताजमहाल, काझीरंगा नॅशनल पार्क, हम्पी, पश्चिम घाट, जयपुर शहर इत्यादी स्थळांचा समावेश आहे. परंतु आत्ताच झालेल्या युनेस्कोच्या बैठकीत महाराष्ट्र राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे ११ किल्ले  व तमिळनाडू मधील १ असे एकूण १२ किल्ले युनेस्को मध्ये सामील करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यासाठी ही गौरवास्पद बाब असून यामुळे भारत देशाचे नाव अजून उंचावले आहे. देशातील आणि जगातील मराठी माणसासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. ह्या बैठकीत “जय भवानी जय शिवाजी” या नाम घोषात छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुक्रमे रायगड ,राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, जिंजी अशा १२ किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे किल्ले युनीस्को मध्ये सामील झाल्याने त्यांना खालील प्रमाणे फायदे होणार  आहेत.


१) आंतरराष्ट्रीय ओळख आणि प्रतिष्ठा
▪️महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळू शकते▪️ महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संस्कृतीची आणि परंपरेची महत्त्वाच्या नोंदी जगाच्या  नकाशावर होणार आहे.

२) पर्यटन वाढ
▪️ देशी आणि विदेशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
▪️ स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते= हॉटेल, गाईड सेवा, हस्तकला, वाहतूक इत्यादींचा विकास होऊ शकतो.

३) संरक्षण आणि संवर्धनासाठी निधी
▪️ युनेस्को आणि केंद्र सरकारकडून गडकिल्ल्यांच्या देखभालीसाठी विशेष निधी मिळू शकतो.
▪️ पुरातत्त्व विभाग आणि इतर संस्था मार्फत शास्त्रशुद्ध संवर्धनाचे कार्य होऊ शकते.

४)  स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी
▪️ स्थानिक लोकांसाठी पर्यटन मार्गदर्शक हस्तकला  विक्रेते स्थानिक पदार्थ विक्रेते अशा विविध स्वरूपातील रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.

५)  संशोधन आणि शैक्षणिक मूल्य
▪️ इतिहासकार, पुरातत्त्वशास्त्रज्ञ, संशोधक यांना अभ्यासासाठी अधिक संधीं मिळू शकतात.

६) सांस्कृतिक वारसाचे जतन.
▪️ जुने गड किल्ले, त्यांचा इतिहास, वास्तुकला, परंपरा आणि लोककथांचा वारसा शास्त्रशुद्ध पद्धतीने जपला जाऊ शकतो.
▪️ भावी पिढ्यांसाठी हे ठिकाण प्रेरणास्थान बनू शकते.


अशा विविध प्रकारच्या कार्यांना   गती मिळणार आहे.खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या  स्वराज्यात  गड किल्ल्यांना या अगोदरच युनिस्को मध्ये  दर्जा मिळाला पाहिजे होता. पण  का मिळाला नाही हाच प्रश्न समाजासमोर उभा रहातो. काही वर्षापूर्वी ह्या सर्व गोष्टी घडल्या असत्या तर आज गड किल्ल्यांची ही दुर्दशा झाली नसती. आज शिवरायांच्या बऱ्याच किल्ल्यांची तटबंदी भिंती पडलेल्या अवस्थेत नसत्या.त्यातील काही इमारती धोकादायक झाल्या नसत्या. सरकारच्या माध्यमातून या वर लक्ष केंद्रित झाला असता तर आपल्या देशातही महाराष्ट्राच्या गड  किल्ल्यांना पर्यटक मिळाला असता.पण त्या गोष्टीचा विचार केला गेला नाही. छत्रपती शिवरायाच्या अशा अनमोल वास्तूकडे लक्ष दिला गेला नाही. त्यामुळे पर्यटक गड किल्ल्याकडे वळवता आला नाही.सरकारने फक्त छत्रपती शिवाजी महाराज  म्हणावं आणि जनतेने जय म्हणून मोकळं व्हावं येवढाच काय तो संबंध. त्यानंतर सरकारने पाच पाच वर्षे  राजकारण कराव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली पोळ्या भाजाव्या. फक्त  मतदानासाठी समाजाचा  वापर करावा.येवढाच काय तो समाजाचा वापर! ही आमची शोकांतिका आहे. असो उशिरा का होईना पण महाराष्ट्राचे नाव  आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांनी युनिस्को सारख्या जागतिक संस्थेत सामील होऊन उंचावला आहे हे मात्र नक्की! महाराष्ट्रात गड किल्ल्यांना युनिस्को चा दर्जा मिळणे म्हणजे एक गौरव नसून हे ऐतिहासिक वारसा स्थळ जपण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहे. तरी पण एक प्रश्न अनुत्तरीतच आहे.ते असा महाराष्ट्रातल्या बाकी  असलेल्या गडकिल्ल्यांचे काय? या वास्तू जतन करून ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला जाग येणार का? या किल्ल्यांची डागडुजी होणार का ? असे अनेक प्रश्न समाजात वावरत असतील.शिव प्रेमींच्या मनात घर करून बसले असतील.याचा सखोल विचार करण्याची गरज महाराष्ट्राच्या जनतेला आणि सरकारला आहे. गड किल्याच्या माध्यमातून पुन्हा शिवराज्य प्रस्थापित व्हावे एवढीच विनंती.🙏

छत्रपती शिवाजी महाराज की जय !
“जय भवानी जय शिवाजी”

                             लेखन: यश माधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed