बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर
दिनांक:३१ मे २०२४
दहावी बारावी चा निकाल आत्ताच जाहीर झाला असून ह्या निकाला मध्ये कोकण बोर्डने अव्वल नंबर पटकावला आहे. जास्तीत जास्त मुले उत्तीर्ण झाल्या कारणामुळे मुलांचे पास होण्याची संख्या वाढली आहे. कोकणातील काही मुले पुढील शिक्षणासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर अशा मोठमोठ्या शहराकडे उच्च शिक्षणासाठी जात असतात. राज्यातील नामांकित संस्थेत अर्ज दाखल करून प्रवेश मिळविण्यासाठी शहराकडे धाव घेत असतात. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना शासनाकडील कागद पात्रांची पूर्तता होणे गरजेचे असते. उदा. जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि अन्य कागदपत्रांची गरज भासत असते. अशावेळी हे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरच्या कसरती कराव्या लागत असतात. शासकीय कार्यालयात एकाच खिडकीवर बरीचशी काम होत असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा पुन्हा -पुन्हा शासन दरबारी पायपीठ करावी लागत असते. तसेच एकाच खडकी वरून अनेक कामे होत असल्या कारणामुळे गर्दीच्या भल्या मोठ्या रांगा विद्यार्थ्यांच्या दिसून येत असतात. अशावेळी विद्यार्थ्याचे काम एका दिवसात ना आटोपता चार- चार दिवस वाया जात असतात. त्यामुळे त्याला उच्च शिक्षणासाठी नामांकित संस्थेत अर्ज दाखल करणे कठीण होते. या विलंबामुळे विद्यार्थ्यांची सीट आरक्षित न होता त्याला आपली सीट त्या संस्थेतून गमवावी लागते. ह्या सर्व अडचणीतून मार्ग काढण्यासाठी व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर कागदपत्रे उपलब्ध होण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील शासकीय कार्यालयातून एकाच ठिकाणी एकाच वेळी आणि एकाच खिडकीवर सर्व दाखले उपलब्ध व्हावे म्हणून उ. बा. ठाचे अल्पसंख्यांक उप जिल्हाध्यक्ष रियाज बशीर खान यांनी सावंतवाडी तालुका तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे.या निवेदनात त्यांनी शासनाकडे एक खिडकी योजनेचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावावर विचार करून लवकरच एक खिडकी योजना सुरू करावी. अशी विनंती सावंतवाडी तहसीलदार यांना करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दाखले लगेच उपलब्ध होतील व उच्च शिक्षणासाठी प्रवेश अर्ज दाखल करण्यास कोणतेही अडथळे येणार नाही. निवेदन देत असताना
त्यांच्यासह श्री साहील खोबरेकर, श्रीकांत धोत्रे, सागर धोत्रे, राहुल माने, राजा खान आणि अक्षर खान उपस्थित होते.

