आताच शेअर करा
नेतर्डे येथे तिलारीचे उपअभियांता अनिल मोहिते यांच्याशी चर्चा करताना नेतर्डे ग्रामस्थ.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर

दिनांक:२२ जानेवारी २०२५


नेतर्डे गावातून तिलारीचा कालवा जाऊन अनेक वर्षे झालीत त्या कालव्यातून अन्य गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र नेतर्डे वासीय तिलारीची पाण्याची लाइन गावात असून सुद्धा मुख्य कालव्याला आउटलेट नसल्याने पाण्यापासून वंचित आहेत. येथील ग्रामस्थांचा उदरनिर्वाह शेती बागायतीवर असून त्यांना तिलारीचे पाणी मिळाल्यास त्यांचे शेती उत्पन्न वाढू शकते त्यासाठी तिलारी विभागाने जी लाईन गावात टाकली आहे. त्यातून गावाला पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थ जगदेव गवस यांनी केली होती अन्यथा 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार तिलारीचे उपअभियंता अनिल मोहिते व ठेकेदार यांनी मंगळवारी सायंकाळी नेतर्डे येथे भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली. तर मुख्य कालव्याला आउटलेट करण्यासाठी येत्या दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना दिले.
   नेतर्डे गावातुन तिलारीचा कालवा जाऊन अनेकवर्षे झाली आहेत. सदर कालव्यामधून अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो मात्र नेतर्डे गावातील कालव्यानजीकची काही घरे सोडल्यास अन्य गावाला त्या कालव्याच्या पाण्याचा फायदा नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ जगदेव गवस यांनी संबंधित विभागाला लेखी निवेदन दिले होते. गावातून कालवा जाऊन अनेक वर्षे झालीत मात्र गावाला पाणी मिळत नाही. कालव्यासाठी केलेल्या भुसंपादनची नुकसान भरपाई सुद्धा मिळाली नाही  त्याबद्दल आपण ऑगस्ट मध्ये आंदोलन केले होते मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे आपण प्रजासत्ताक दिनी उपोषण करणार असल्याचा इशारा संबंधित विभागाला दिला होता.
    जगदेव गवस यांनी उपोषण करण्याचा इशारा दिल्या नंतर तिलारी विभागाचे उपअभियंता अनिल मोहिते आणि ठेकेदार यांनी मंगळवारी सायंकाळी जगदेव गवस आणि नेतर्डे ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थ जगदेव गवस, किशोर गवस, उमाकांत गवस, सुरेश गवस, अनंत गवस, महादेव गवस, हरी गवस व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी त्यांना गावात पाईप लाईन घालून सुद्धा आपण पाणी का सोडत नाही असा सवाल केला. येथील लोकांचे शेती व बागायती हे प्रमुख उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे गावातून कालवा जाऊन सुद्धा आम्हाला काही फायदा नाही. त्यामुळे आपण लवकरात लवकर मुख्य कालव्याला आउटलेट करून आमची समस्या सोडवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
    यावेळी उपअभियंता मोहिते यांनी सदर ठिकाणी आउटलेट करण्यासाठी गोव्याला जाणारा पाणी पुरवठा बंद करावा लागणार त्यासाठी सुमारे पंधरा दिवस पाणी पुरवठा बंद करावा लागेल त्यामुळे येत्या दोन दिवसात त्याची वरिष्ठ स्तरावर कार्यवाही करून त्यासाठी लागणारा पाठपुरावा करणार असे आश्वासन उपस्थित  ग्रामस्थाना दिले. तर येत्या दोन दिवसात तुम्हाला आपण काम कधी सुरु करणार याची माहिती देणार असे आश्वासन दिले. तर दोन दिवसात लेखी आश्वासन न मिळाल्यास आपण उपोषण करणार असा इशारा यावेळी ग्रामस्थ जगदेव गवस यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *