
बांदा प्रतिनिधि अक्षय मयेकर
दिनांक: १३ जानेवारी २०२५
बांदा येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजाराम ऊर्फ बाळू सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी १७ ला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
बांदा ग्रामपंचायतवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे पाच वर्षात पाच जणांना उपसरपंचपदाची संधी देण्याचे धोरण भाजपने ठरविले आहे. त्यानुसार जावेद खतीब, त्यानंतर राजाराम सावंत यांना उपसरपंच पदी संधी देण्यात आली. आता तिसऱ्या वर्षी प्रभाग क्रमांक एकचे ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ आबा धारगळकर यांची उपसरपंच पदी वर्णी लावण्यात येणार आहे. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी सौ. लीला मोर्ये यांनी जाहीर केला आहे.
सकाळी ९.३० ते ११.३० वाजेपर्यंत निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करणे, दुपारी १२ ते १२.१५ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र छाननी प्रक्रिया, दुपारी १२.१५ ते १२.३० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र माघार घेण्याचा कालावधी असणार आहे. निवडणुकीत एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्यास दुपारी १ वाजता प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यानंतर तात्काळ उपसरपंचाचे नाव जाहीर करण्यात येईल. ग्रामपंचायतीत १५ पैकी १३ ग्रामपंचायत सदस्य हे सत्ताधारी भाजप पक्षाचे आहेत. त्यामुळे उपसरपंच निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन सौ लीला मोर्ये काम पाहतील.