
सिंधुदूर्ग संपादकीय
दिनांक: २ जानेवारी २०२५
वैभववाडी शहर व एडगावच्या मध्य भागातून वाहणाऱ्या सुख नदीच्या पारकोंडीवर सुमारे 50 लाख रुपये खर्च करून गत वर्षी पक्या बंधाऱ्याचे काम झाले.त्यामुळे या कोंडीला पुन्हा वैभव प्राप्त होत असून तिच मूळ नैसर्गिक सौंदर्य खुलत आहे.बंधाऱ्याला नुकत्याच फळ्या टाकून पाणी अडविले गेले आहे.
वैभववाडी बाजारपेठ, माईणकर वाडी आणि एडगाव इनामदार वाडीच्या मध्य भागातून वाहणाऱ्या सुख नदीच्या परकोंडीत हा बंधारा होत आहे.30-35 वर्षा पूर्वी या नदीतील पारकोंड म्हणजे इथल्या लोकांचे व चाकरमान्यांचे प्रेक्षणीय स्थळ होते. मासे मारणे, नदीत पोहणे, डुबक्या मारणे या साठी पारकोंड प्रसिद्ध होती.मी सुद्धा या कोंडीतील मळव्या माशाचे टॉनिक खात खात लहानाचा मोठा झालो आहे.
त्या काळात आजूबाजूच्या विहिरींना मुबलक पाणी होते.नंतर पुरामुळे पारकोंडीत गाळ साचून नदी भरून गेली. त्यानंतर या कोंडीत पोहण्याचा मनसोक्त आनंद कोणाला लुटता आलेला नाही. याची खंत अनेकांना होती.ती दूर करण्याचे काम वाभवे नगरपंचायत कडून झाले आहे.आता पाणी अखेर पर्यंत कसे साठवून ठेवता येईल या साठी प्रयत्न सुरु आहेत.
राज्य शासनाने दिलेल्या विकास कामांच्या निधीतून अंदाजे 50 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी नगरपंचायतीने गत वर्षी पक्का बंधारा बांधला आहे.तसेच नदीतील गाळही काढला आहे.पुढे पारकोंडीत पाणी साचले की अनेकांना पोहण्याचा आनंद लुटता येणार आहे. आजूबाजूच्या विहिरींचे पाणी वाढणार आहे.तसेच लवकरच अरुणा प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी नदीत सोडले जाणार असल्याने अशा बंधाऱ्यामुळे ते अडवून ठेवता येणार आहे.आता पर्यंत एडगावात तीन पक्के बंधारे झाले असून पारकोंडीतील आणखी एका बंधाऱ्यामुळे चौथ्या बंधाऱ्याची भर पडली आहे.त्यामुळे त्याचा अधिक फायदा एडगावला होणार आहे.
ज्ञानेश्वर रावराणे


