आताच शेअर करा
पाडलोस : शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अधिकारी.

बांदा  प्रतिनिधि: अक्षय मयेकर

दिनांक २५ डिसेंबर २०२४


भात पिकाची प्रत्येक गोष्ट उपयोगी ठरते. कोणताही अवशेष वाया जात नाही. भात कापणी झाल्यानंतर शेतीत कडधान्य पिकवल्यास जमिनीची सुपीकता वाढते. शेतकऱ्यांनी जमीन पडीक न ठेवता लागवडीखाली आणावी. तसेच एक घर एक गाय संकल्पना राबवल्यास शेतकरी स्वावलंबी बनू शकतो, असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक श्री. सद्गुरु सर यांनी केले.
पाडलोस येथे कृषी विभागातर्फे सिंधूरत्न योजनेअंतर्गत शेतीदिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. सद्गुरु बोलत होते. व्यासपीठावर पाडलोस कृषी सहाय्यक श्वेता बेलगुंदकर, कृषी अधिकारी मिलिंद निकम, अक्षय खराडे, पाडलोस सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक उपस्थित होते.
मिलिंद निकम म्हणाले की, रोगमुक्त आरोग्यासाठी सेंद्रिय भात शेती करणे काळाची गरज आहे. कोरोना काळात उकड्या तांदळाची पेज खाल्ल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचले. त्यामुळे भात शेतीकडे युवकांनी वळावे असे आवाहन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले.
अक्षय खराडे म्हणाले की, पाडलोस गावात शेतीकडे लहान मुले वळल्याचे पाहून समाधान वाटले. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत शेतीपूरक व्यवसाय करावा असे त्यांनी सांगितले.
शेती दिन कार्यक्रमास महिला शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. सूत्रसंचालन पाडलोस कृषी सहाय्यक श्वेता बेलगुंदकर यांनी केले. तर आभार पाडलोस सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी मानले.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *