
बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर
दिनांक:२१ ऑगस्ट २०२४
मागच्याच वर्षी एसटी महामंडळाकडून मोठ्या दिमाखात बांदा-बोरिवली, बांदा पुणे मार्गे मुंबई, बांदा-लातूर अशा संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव निघणाऱ्या स्लीपर बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. पण भारमान कमी असल्याचे कारण देत सदर गाड्या या अचानकपणे बंद करण्यात आल्या.जेव्हा प्रवासी सदर गाड्यांचे आरक्षण करण्यासाठी गेल्यावर सदर बाब निदर्शनास येताच आज बांदावासीयांनी कणकवली येथील एसटी महामंडळाचे सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक श्री अभिजीत ब. पाटील यांची भेट घेत सदर गाड्या पुन्हा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. यावेळी बोलताना गुरु कल्याणकर यांनी सांगितले की, एसटी महामंडळ बांदा,सावंतवाडी,कुडाळ व सिंधुदुर्गातील इतर बस स्थानकांच्या सुशोभीकरणाकरिता करोडो रुपये खर्च करत आहे. जर प्रवाशांना गाड्याच उपलब्ध होत नसतील तर सर्वसामान्य जनतेच्या पैशांचा हा दुरुपयोग आहे. असे करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा लोकांच्या सोयीच्या व गरजेच्या बसेस चालू ठेवल्या तर त्याचा सर्वसामान्य गोरगरीब लोकांना उपयोग होईल. सदर बंद केलेल्या बसेस मध्ये बंद केलेल्या दिवशी देखील पूर्ण भारमान होते. तसेच महिलांना अर्ध्या तिकिटात मुंबई सारख्या ठिकाणी प्रवास करता येत असल्याने पंचक्रोशीतील महिलांची फार मोठी सोय होत होती. अशा निर्णयांमुळे नागरिकांची गैरसोय होते हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सदर गाड्या गणपती पूर्वी चालू कराव्यात अशी मागणी यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली. यावेळी बोलताना हेमंत दाभोलकर व बांदा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी देखील लांब पल्ल्याच्या गाड्या बसस्थानकात न थांबणे, बसस्थानकातील दुरावस्था व प्रवाशांच्या इतर अडचणी उद्भवणाऱ्या समस्यांबाबत विभाग नियंत्रकांशी चर्चा केली. यावर विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांनी सांगितले की,सदर स्लीपर ह्या पूर्णभारमान असलेल्या बसेस होत्या. परंतु सदर गाड्या सुरू करण्याबाबत काही अडचणी असून त्याबाबत आपण प्रत्यक्ष पालकमंत्र्यांशी बैठक करून नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले. तसेच गणपतीच्या सणाच्या दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरता ७ सप्टेंबर ते १८सप्टेंबर पर्यंत मुंबई बांदा-बोरीवली व बांदा-निगडी अशा 45 सीटर सिटिंग बसेस सुरू करण्यात येतील असे आश्वासन देखील दिले.तसेच आपल्या विभागाकडे कर्मचाऱ्यांची त्याचप्रमाणे बसेसची देखील कमतरता असल्याचे सांगितले व त्याकरता पालकमंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष बैठक घेऊन मागणी करणार असल्याचे देखील सांगितले.
यावेळी बांदा ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून गुरु कल्याणकर, प्रशांत बांदेकर, हेमंत दाभोलकर, ज्ञानेश्वर सावंत,व्यंकटेश ऊरुमकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
