
सिंधुदुर्ग/प्रतिनिधी: यश माधव
ता १२एप्रिल २०२४
कोकणात लग्न समारंभात सजावटीसाठी हमखास वापरण्यात येणाऱ्या भेंडले माडाच्या पानांना मुंबई पुण्यात मागणी वाढल्याने या पानांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बिनदिक्कतपणे राजरोस तस्करी होत आहे. महिन्याला लाखो रुपयांचा नफा कामाविणाऱ्या या व्यवसायिकांवर कारवाई न करता वनखाते मात्र डोळ्यावर पट्टी ठेऊन असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या होणाऱ्या तस्करीला न रोखल्यास भविष्यात भेंडला माड कोकणातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
कल्पवृक्ष कुळातील भेंडला माड हे झाड येते. कोकणात विपुल प्रमाणात हे झाड आहे. या झाडांची पाने ही कोकणात लग्न समारंभ किंवा धार्मिक कार्यात सजावटीसाठी वापरण्यात येतात. कोकणात विपुल प्रमाणात हे झाड असल्याने परप्रांतीय व्यवसायिकांची वक्रदृष्टी या झाडावर पडली आहे. अनेक व्यापाऱ्यांनी अक्षरशः या झाडांची तोड करत या झाडांची पाने व्यापारी फायद्यासाठी मुंबई पुणे या महानगरात पाठविण्यास सुरुवात केली आहे. दर दिवशी मोठ्या प्रमाणात या पानांच्या पेंड्या बनवून त्या विक्रीसाठी मुंबईला पाठविण्यात येत आहेत. हा प्रकार गेली कित्येक वर्षे अव्याहतपणे सुरु असूनही वनखाते याकडे दुर्लक्ष करत असल्याने हे व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या गब्बर बनले आहेत.
‘कोकण व्हिजन न्युज’ने याबाबत माहिती घेतली असता धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दर दिवशी लाखोंची उलाढाल यातून होत आहे. वनखात्याच्या स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून पानांची वाहतूक होत असल्याने कुंपणच शेत खात असल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.