आताच शेअर करा

दिनांक: २९/०८/२०२६

बांदा: सह्याद्रीच्या दुर्गम कुशीत वसलेल्या जिल्हा परिषदेच्या घारपी शाळेतील स्काऊट-गाईड कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करत सामाजिक व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक स्वनिर्मित राख्या बसचालक व वाहकांना बांधून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
घारपी परिसरातील आबालवृद्ध तसेच आठवीपासून पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासात बसचालक व वाहकांची महत्त्वाची भूमिका आहे. दुर्गम, डोंगराळ व वळणावळणाच्या रस्त्यांवरून प्रवास करताना विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत तसेच पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी पोहोचविण्याचे काम बसचालक व वाहक नियमितपणे करतात. त्यांच्या या सेवेमुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास अधिक सुरक्षित व सुकर झाला आहे.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध रंगांच्या साहित्याचा वापर करून आकर्षक राख्या स्वतः तयार केल्या. या राख्या बसचालक संतोष पाटील व वाहक महेश नाईक यांच्या मनगटावर बांधून विद्यार्थ्यांनी त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी प्रेमाने बांधलेल्या राख्यांमुळे बसचालक व वाहकही भारावून गेले.
सह्याद्रीच्या दुर्गम भागातील प्रतिकूल परिस्थितीतही बसचालक व वाहक आपली सेवा बजावत असतात. पावसाळ्यातील खडतर रस्ते, डोंगराळ वळणे आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवास घडवून आणणाऱ्या या सेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
स्काऊट-गाईड चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, शिस्त, सेवा, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविली जाते. याच भावनेतून विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित राख्या तयार करून बसचालक व वाहकांना बांधल्या. रक्षणाचे नाते केवळ रक्ताचे नसते, तर माणुसकी, आपुलकी आणि विश्वासातूनही निर्माण होते, हा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित ग्रामस्थांनाही राख्या बांधून स्नेहबंध जपला. तसेच शाळेच्या परिसरातील झाडांनाही राख्या बांधून वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. ‘वृक्ष हेच जीवन’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी निसर्गाशी असलेले आपले नाते अधोरेखित केले. रक्षाबंधनाच्या माध्यमातून मानवाबरोबरच पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक जे. डी. पाटील, शिक्षक सहकारी आशिष तांदुळे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, ग्रामपंचायत सदस्या स्वाती गावडे, पोलीस पाटील समृद्धी गावडे,स्वयंपाकी मदतनीस संचिता सावंत, जितेंद्र गावंडे, सुनिल गावडे,हरिअप्पा गावडे,सागर गावडे ,लवू गावडे,, एकनाथ गावडे, सोनाली कविटकर, गजानन सावंत, वासुदेव नाईक,,संतोष गावडे तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या या अभिनव, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed