दिनांक: २९/०८/२०२६

बांदा: सावंतवाडी तालुक्यातील डेगवे, मोरगाव, आडाळी, नेतर्डे, डोंगपाल व डिंगणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा वावर वाढल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींकडून शेती-बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई यांनी वन विभागाकडे केली आहे.
याबाबत मधुकर देसाई यांनी शुक्रवारी सावंतवाडीच्या उपवनसंरक्षकांना निवेदन दिले. सध्या हत्तींचा वावर डेगवे परिसरात असून, गेल्या दोन दिवसांत हत्तीने विविध शेतकऱ्यांच्या शेती व बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. डेगवे परिसर शेती व बागायतीने समृद्ध असल्याने हत्तींच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हत्तींच्या धुमाकुळामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या उपजीविकेवरही परिणाम होत आहे. हत्तींचा वावर कायम राहिल्यास भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून हत्तीला त्याच्या नैसर्गिक अधिवासात तसेच कळपाजवळ सुरक्षितपणे पोहोचवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
वन विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन शेती-बागायतीचे नुकसान थांबवावे आणि ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मधुकर देसाई यांनी केली आहे.
