
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
दिनांक: ११ मार्च २०२५
पडवे धनगरवाडी येथे कमी वोल्टेजने वीजपुरवठा, वीज पुरवठा वरचेवर खंडित होणे, पंप,घरगुती उपकरणे नादुरुस्त होणे अशामुळे नागरिक त्रस्त झाले होते. २०१८ साली आलेल्या वादळाच्या वेळी सदर वाडीतील सर्व वीज वाहिन्या तसेच सर्व विद्युत खांब कोसळले होते. त्यावेळ पर्यंत तेथे थ्री फेज लाईन चालू होती. परंतु त्यावेळी दुरुस्ती करताना सदर लाईन ही सिंगल लाईन केल्याने संपूर्ण वाडीतील ५० ते ६० घरांना गेली आठ वर्षे अपुऱ्या विद्युत दाबाच्या पुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पंप न चालणे,घरगुती उपकरणे नादुरुस्त होणे,लाईट वरचे वर जाणे अशामुळे शालेय विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होत होते.अशामुळे सर्व नागरिक हैराण झाले होते. अखेर नागरिकांनी सदर भाजपाचे बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर यांच्याशी संपर्क साधत कैफियत मांडली. त्यानंतर गुरु कल्याणकर व ग्रामस्थ यांनी कुडाळ येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांची भेट घेत नागरिकांच्या सह्यांचे निवेदन व थ्री फेज लाईनची मागणी सादर केली. कार्य.अभि. वनमोरे यांनी त्याची त्वरित दखल घेत महावितरणच्या दोडामार्ग कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता सुरज नायर यांना दूरध्वनीवरून सदर समस्या त्वरित सोडवण्याच्या सूचना दिल्या.ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने देखील लगेच नायर यांची भेट घेत आठ दिवसात सदर समस्या दूर करण्याची व थ्री फेज लाईन करून देण्याची मागणी केली.नायर यांनी देखील आठ दिवसात सर्व समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपाचे बांदा मंडल क्रीडा संयोजक गुरु कल्याणकर, रवींद्र शिंदे, विनय शिंदे, समिर शिंदे, शरद घारे, विहार शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.