
दिनांक: २३/०८/२०२६
सावंतवाडी: मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न सुटला ही आनंदाचे बाब आहे. हॉस्पिटल उभे राहणे ही शिवरामराजे आणि माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत यांना श्रद्धांजली आहे, असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. दरम्यान ८८ कोटी रुपये खर्च करून सावंतवाडीत लवकरच ८ मजली इमारत उभारली जाणार आहे. त्याचा फायदा लोकांना होणार आहे. येत्या दोन महिन्यात हे काम सुरू होईल, मात्र या ही इमारत शासकीय असल्यामुळे त्याला कोणाचे नाव देता येणार नाही असेही केसरकर यांनी स्पष्ट केले
श्री. केसरकर यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, तालुकाप्रमुख नारायण राणे, नगरसेवक अजय गोंदावळे, क्लेटस फर्नांडिस, निशांत तळवणेकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. केसरकर म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ गोव्याला टेकून आहे. या ठिकाणी या मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी राजघराण्याने तत्कालीन परिस्थितीत अनेक सोयी त्यावेळी देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सावंतवाडी राजघराणे नेहमीच या ठिकाणी विकासासाठी झटले आहे. मल्टीस्पेशालिटीच्या जागेवरून गेली अनेक वर्ष वाद होता. तो वाद दोन्ही कुटुंबांनी तडजोडीची भूमिका घेतल्यामुळे सुटला आहे. दोन्ही गटांनी एकाच वेळी अॅफीडेव्हीट दिल्यामुळे आता मल्टीस्पेशालिटीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आम्ही सावंतवाडी राजघराण्याच्या दोन्ही कुटुंबांचे आम्ही आभार मानत आहोत. लवकरच हा प्रश्न आता सुटणार आहे. त्याच्या चार दिवसात उर्वरित जमीन दोन्ही कुटुंबांना दिली जाणार आहे तर शासनाला मिळालेल्या ९० गुंठे जमिनीत नवीन इमारत उभारण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी चार वर्षांपूर्वीच हा प्रश्न सुटला असता. परंतु या ठिकाणी काही तांत्रिक बाबी निर्माण झाल्यामुळे हा प्रश्न अनुत्तरीत राहिला. त्यामुळे ३८ कोटीचा खर्च आता ८८ कोटीवर गेला आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे हे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमच्या हालचाली असणार आहेत.
नव्या इमारतीला राजघराण्यातील व्यक्तीचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राजघराण्यांकडून करण्यात आली. याबाबत श्री. केसरकर यांना विचारले असता. ते म्हणाले, ही इमारती शासकीय आहे. त्यामुळे कोणाचे नाव देता येणार नाही. शक्तीपीठ महामार्ग जळगावला जोडला जावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत तर चौकुळ मध्ये त्याचा बायपास असावा, अशी आमची मागणी आहे. मागणी पूर्ण झाल्यास निश्चितच त्या ठिकाणचा विकास होणार आहे. सावंतवाडी शहरातील सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत केसरकर यांचे लक्ष वेधले असता. ते म्हणाले, जिल्हा नियोजनच्या निधी मधून सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत तसेच रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावरपाठपुरावा केला जाईल.
