
दिनांक: ०९/०६/२०२६
न्हावेली प्रतिनिधी: न्हावेली गावातील पार्सेकरवाडी ते कुंभारभाट परिसरातील मुख्य विद्युत वाहिनीवरील सुमारे १० ते १२ जीर्ण आणि धोकादायक झालेले वीज खांब बदलण्याच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाच महावितरणने ही मोहीम हाती घेतल्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
पूर्वीच्या निवेदनाची दखल
यापूर्वी माजी उपसरपंच अक्षय गुंडू पार्सेकर यांनी महावितरणकडे अधिकृत निवेदन देऊन हे धोकादायक खांब त्वरित बदलण्याची मागणी केली होती. पावसाळ्यात हे खांब शेतात कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. या निवेदनाची आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेची गांभीर्याने दखल घेत महावितरणने आता हे जीर्ण पोल बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
अधिकारी व अभियंत्यांचे मानले आभार
कामाची प्रत्यक्ष सुरुवात झाल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने महावितरणचे उप अभियंता राक्षे आणि अभियंता खांडेकर यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावल्याबद्दल प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
ग्रामस्थांची उपस्थिती
नवीन पोल बसवण्याचे काम सुरू असताना माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्यासह गावातील प्रमुख तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.
यामध्ये ओम पार्सेकर, अमोल पार्सेकर, प्रथमेश आरोंदेकर, सीताराम परब, सौरभ पार्सेकर या सर्वांनी उपस्थित राहून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले. हे जीर्ण पोल बदलल्यामुळे आता पावसाळ्यात होणारा वीज खंडित होण्याचा त्रास आणि संभाव्य धोका टळणार आहे.
