आताच शेअर करा

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

दिनांक: ११ फेब्रुवारी २०२५

तळवणे येथील राजाधिराज योगीराज श्री महंत सद्गुरू परशुराम भारती महाराज यांच्या मठातील भंडारा उत्सवाला १२ फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. भंडारा उत्सवाचा सोहळा हा जवळ जवळ पाच दिवस सुरु असतो. येत्या १२ फेब्रुवारी पासून सुरु होत असून १६फेब्रुवारी पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे.

     भंडारा उत्सव म्हटलं कि अनेक भाविक कोल्हापूर, कर्नाटक, तसेच अनेक ठिकाणाहुन खास श्री परशुराम भारती महाराज यांच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच गावातील काही कुटुंब कामानिमित्त बाहेर राहत असणारे भाविक आवर्जून उपस्थिती दर्शवितात.
    जनकल्याण व आत्मज्ञानाच्या शोधात भ्रमंती करण्याची आवड असणारी महाराजांची योगी वृत्ती त्यामुळे कोल्हापूरच्या दिशेने तीन साधू या कोकण प्रांतातील ‘सुंदरवाडी’ संस्थांनात आले. तीन सत्पुरुष म्हणजे श्री दामोदर भारती, श्री गुरु गोसावी आणि श्री परशुराम भारती, यापैकी परशुराम भारती महाराज तळवणे गावी आले.
     तळवणे गावाशेजारील तीन बाजूंनी डोंगर व एका बाजूला खाडी अशी दरी पाहून श्री योगी राजांना तेथेच वास्तव्य करण्याची इच्छा निर्माण झाली. तळवणे गावातील मूळ  ग्रामस्थांच्या शुद्ध, सात्विक  व पवित्र भावनेचे प्रतिक असणाऱ्या श्री देव रवळनाथास योगी राजांनी आपल्या तपोबलाने पाचारण  केले व आपल्या मनातील योग साधना व तपश्चर्येचा हेतू सांगितला. प्रत्यक्ष सिद्ध पुरुष आपल्या गावात राहू इच्छित आहे हे पाहून श्री रवळनाथास अत्यंत आनंद झाला व त्याने योगीराजास राहण्याकरिता जागा आखून देऊन त्यांचे शिष्यत्व पत्करले. श्री योगीराज यांनी त्रिशूल  मारून डोंगराच्या पायथ्याशी झरा निर्माण केला आणि डोंगरावरील एका प्रचंड शिळेच्या तळाशी ते समाधीला  ध्यान धारणेस  बसू लागले. या निर्जन  तसेच जंगलाने वेढलेल्या शिळेखाली ते जेव्हा ध्यानधारणेस बसत तेव्हा एक वाघ नित्यनेमाने त्यांच्या शेजारी बसत असे त्या वाघाची कालांतराने समाधी त्याच ठिकाणी बांधली गेली. अशा तऱ्हेने तळवणे गाव हा राजाधीराज योगीराज महंत  सद्गुरु परशुराम भारती महाराजांच्या तपोभूमीमुळे पावन झाला.
   एक दिवस श्रीमंत खेमसावंत राजे साहेबांना उन्मनी अवस्था लाभली व ते निर्विकल्प आरोहण करते झाले. शरीराची हालचाल बंद झाली. समाधी योगाच्या अज्ञानामुळे जवळच्या लोकांना वाटले की श्रीमंताचे देहावसान झाले. त्यांनी ओटवणे येथे त्यांच्या दहनाची व्यवस्था केली. त्यावेळी श्री परशुराम भारती महाराज आरोंद्याच्या बाजूला होते. त्यांना अंतर्ज्ञानाने ही गोष्ट कळली आणि नदी मार्गाने ओटवणे गाठण्यासाठी आपल्या योग सामर्थ्याने तेरेखोल खाडीस भरती आणली. केळीच्या पानावर बसून आरोहण करत करत ते बांदा शेजारील तूळसण पुलापर्यंत पोहोचले. तितक्यात त्यांना झालेल्या बंदुकीच्या तोफांचा  आवाज ऐकू आला. तिकडे ओटवणे गावी श्रीमंत खेमसावंतांना अंत्यसंस्कार करून बंदुकीच्या फैरी काढल्या गेल्या होत्या.    गुरु आणि शिष्याची भेट ही अधुरीच राहिली. तेव्हा श्री परशुराम भारती महाराजांना परमखेद झाला.’ईश्वरेच्छा बलीयेसी ‘ असे म्हणून ते माघारी वळले.
    श्री परशुराम भारती हे पहिल्या खेम सावंतांचे मोक्षगुरु असल्यामुळे त्यांच्या मुलांनीही त्यांना आपले कुलगुरू मानले व तळवणे येथे मठ बांधला. मात्र आपला परम शिष्य खेम सावंत यांच्या निधनानंतर श्री महाराज अतिशय दुःखी झाले. समाधी अवस्थेत ते तळवणे येथील मठात झोपून राहिले. येणारे भक्त जन त्यांचे दर्शन घेत, आणलेली फुले, प्रसाद यांच्या शेजारी ठेवत. अशाप्रकारे फुलांचा ढीग वाढतच गेला तरी महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आलेच नाहीत. त्यांनी माघ शु. पौर्णिमा दि. १६ फेब्रुवारी १६४० मध्ये चिरनिद्रा घेतली हे लक्षात येताच त्यांच्या भक्तगणाने तिथेच जमिनीवर त्यांच्या भोवती बांधकाम केले व वरचा भाग तसाच उघडा ठेवून त्यात विभूती भरली. भारतातील जमिनीवर बांधलेली व वरून उघडी असणारी ही एकमेव समाधी आहे. अलीकडेच नूतनीकरण करण्यात आल्यामुळे वरील भाग बंद करून केवळ प्रतीक स्वरूपात एक मोकळी फरशी बसवलेली आहे
     सध्या श्री परशुराम भारती मठात श्री राजेंद्र स्वामी महाराज हे गादीवर विद्यमान आहेत. तेथील सर्व कारभार राजेंद्र स्वामींच्या आदेशनुसार चालतो.    विद्यमान मठाधीश महंत श्री. राजेंद्र भारती हे मठाचे कार्य व श्री परशुराम भारती महाराज यांची योगपरंपरा चालवीत आहेत. यांच्या अगोदर बरेच स्वामी होऊन गेले त्यातील महंत शुक्र भारती, महंत शाम भारती, महंत सुंदर भारती, महंत बुध भारती, महंत चिदानंद भारती, महंत गंगा भारती,  महंत रघु भारती, महंत जयदेव भारती,  महंत अर्जुन भारती, महंत भीव भारती, महंत पूर्ण भारती,  महंत अनंत भारती, महंत रामचंद्र भारती महंत सदानंद भारती अशी या स्वामींची नावे आहेत.
       श्री परशुराम भारती महाराजांची संजीवन समाधी जागृत स्थान मानले जात असून अनेक भाविक भक्तांना त्यांच्याकडून दृष्टांत झाला आहे. तसेच समाधीकडे इष्ट फलप्राप्तीची इच्छा मनःपूर्वक केल्यास ‘जशी त्याची भावना तसे त्याला फळ प्राप्त होईल’ या मठाच्या गादीच्या पूर्वांपार चालत असलेल्या आशीर्वादाचे फळ मिळते. त्यामुळे वर्षभर या मठात  भाविक भक्तांची ये-जा असते. सावंतवाडी तालुक्यातील तळवणे सारखे  एक छोटेसे गाव राजाधिराज योगीराज श्री महंत सद्गुरु परशुराम भारती महाराज यांच्या तापश्चर्येमुळे पावन झाले असून त्याची कीर्ती सर्वदूर पसरत आहे.
    या भंडारा उत्सवा निमित्त अनेक कार्यक्रम केले जातात. सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत पाचही दिवस कार्यक्रम चालू असतात. पहिल्या दिवशी सकाळी ८:०० वाजता गणपती पूजन, देवतावंदन, पुण्याहवाचन, आचार्यवरण, स्थतप्राकारशुद्धी, समाधिपुरुषावर लघुरुद्र, असे बरेच विधी होणार असून दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर पालखी सोहळा, पावणी झाल्यानंतर रात्री आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा “भारतीगाथा ” हा नाट्यप्रयोग होणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकदिवशी रात्री नाट्यप्रयोग होणारच आहेत.
     त्यातील एक खास आकर्षण म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या जीवनावर आधारित वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा श्री देवी माऊली कला क्रीडा मंडळ,  तळवणे आयोजित “अयोध्याधिश श्रीराम ” हा ट्रिकसीन युक्त नाट्यप्रयोग होणार असून प्रभू श्रीरामांची अयोध्या तळवणे येथील श्री परशुराम भारती महाराज यांच्या मठातील रंगमंचावर ट्रिकसीन नाटकाच्या माध्यमातून अवतरणार आहे.
    अशी ही श्री सद्गुरू परशुराम भारती महाराज या महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही तळवणे गावातील भूमी आणि त्यांच्या आशीर्वादाने आज पर्यंत अखंड चालत आलेला हा भंडारा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
     खास करून सांगायचं झाल तर ही  श्री परशुराम भारती महाराज यांची तळवणे गावातील संजीवन समाधी व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीक्षेत्र आळंदी येथील संजीवन समाधी व्यतिरिक्त इतरत्र कुठेही अशी संजीवन समाधी आढळून येत नाही.
    भंडाऱ्यात श्री गणपती मूर्तिचे पूजन केले जाते. व विराजमान असलेल्या गणेश मूर्तिचे सहाव्या दिवशी विसर्जन केले जाते. त्यानंतर कार्यक्रमाची समाप्ती होते.
   सर्व भाविकांनी भंडारा उत्सवास उपस्थित राहून राजाधिराज योगीराज श्री महंत सद्गुरू परशुराम भारती महाराज यांचे आशीर्वाद घ्यावेत असे आवाहन मठाधिपती श्री राजेंद्र भारती स्वामी यांनी तसेच गावातील स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *